नवी दिल्ली – जळगाव लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत नियम 377 अंतर्गत मागणी केली. त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांवर प्रकाश टाकत केंद्र सरकारकडे नवोदय विद्यालय स्थापनेची मागणी केली.
खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, नवोदय विद्यालये ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे साधन ठरली आहेत. ही विद्यालये आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सांस्कृतिक, नैतिक आणि साहसी उपक्रमांवर भर देतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. मात्र, जळगाव लोकसभा क्षेत्रात अद्याप एकही नवोदय विद्यालय नाही, ही मोठी शैक्षणिक असमानता आहे.
जळगाव हा देशातील मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असून, दोन लोकसभा क्षेत्रांमध्ये विभागला आहे तरी जळगाव लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील अनेक प्रतिभावान विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात.
“जळगाव लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयामुळे उत्तम शैक्षणिक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे केंद्र सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा,” असे खासदार स्मिता वाघ यांनी आग्रहाने सांगितले.
त्यांच्या या मागणीमुळे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नव्या शैक्षणिक संधी निर्माण होतील. सरकारकडून सकारात्मक निर्णय होईल.